पंचसूत्री

शेतकरी – कामगार – सहकार – शिक्षण – आरोग्य या पंचसूत्रीवर श्रीशिवशंभुट्रस्टसंघटना काम करेल. हे सर्व घटक एकमेकांशी संबंधितच आहेत. यांना कुणी वेगळ करू शकत नाही. या घटकांना सक्षम व परिपूर्ण बनविणे, म्हणजेच विकास होय. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या  न्यायासाठी, त्यांना सक्षम व संपन्न बनविण्यासाठी लढा देणे हेच ‘श्रीशिवशंभुट्रस्ट उद्दिष्ट आहे. 

शेतकरी :

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गापुढे आज अनेक अडचणी उभ्या आहेत. खतांचे व बियाणांचे भाव, पीक विमा, कृषी कर्ज अशा अनेक बाबतींत शेतकरी पिचला जात आहे. 

 

नैसर्गिक आपत्तीचे संकट तर नेहमीच असते, मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात देखील शासन – प्रशासन नैराश्य दाखवते. शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध व्हावे, याकरिता शासन – प्रशासनाला योग्य पद्धतीने भरीव योजना राबविण्यास व शेतकरी वर्गास न्याय देण्यास स्वराज्याची संघटीत शक्ती भाग पाडेल. 

कामगार :

राष्ट्राची अर्थव्यवस्था चालविणारा कामगार वर्ग हा वेतन पद्धती, कामाचा अतिरिक्त भार, पिळवणूक अशा अनेक अन्यायांनी ग्रस्त आहे. थेट रोजगार निर्मितीशी संबंधित हा घटक असून राष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका पार पडतो. 

 

उद्योगधंदे मोठे होतात, मात्र कामगार जिथे होता तिथेच राहतो. सफाई कामगार पासून ते मोठा अधिकारी अशा सर्व स्तरांतील कामगारांच्या न्यायासाठी,  कामाचा योग्य मोबदला, सन्मानाची वागणूक  व न्याय्य हक्कांची जपणूक यांसाठी स्वराज्य कार्य करेल. 

सहकार :

राज्यातील मोठा शेतकरी व कामगार वर्ग हा सहकार क्षेत्रावर आधारलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पासून ते सहकारी उद्योगांपर्यंत हे क्षेत्र विस्तारलेले आहे. सहकार क्षेत्र रोजगार निर्मिती बरोबरच व्यवसाय उभारणीला देखील पाठबळ देऊ शकते. 

मात्र प्रस्थापितांमुळे सहकाराची हि उद्दिष्टे समाजाच्या भल्यासाठी न वापरता इतर कारणांसाठीच वापरली जात आहेत. सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी व त्या माध्यमातून शेतकरी, कामगार, युवक वर्ग यांच्या कल्याणासाठी स्वराज्य कार्यरत राहील.

शिक्षण :

राष्ट्राच्या उन्नतीसाठी शिक्षण हा अविभाज्य घटक आहे. शिक्षण हा समृद्धीचा पाया आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कला, क्रीडा, संस्कृती, कृषी, कौशल्य, आरोग्य, उद्योग-व्यवसाय या सर्व बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. कोणत्याही क्षेत्रात कार्य करायचे असेल तर त्या क्षेत्रातील शिक्षण असणे अत्यंत गरजेचे असते. जितके चांगले शिक्षण, तितकी जास्त प्रगती व तितकेच समृद्ध जीवन हा सरळ साधा मंत्र आहे.  

यासाठी शिक्षण व्यवस्था तितकी सक्षम असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. हि परिस्थिती सुधारण्यासाठी व गोरगरीब व सर्वसामान्य  मुलांना, त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी स्वराज्य संघटना कार्यरत राहील. 

आरोग्य :

समाज जितका सुदृढ, राष्ट्र तितकेच बळकट राहते ! एक सुदृढ समाजच राष्ट्राला संपन्न व समृद्ध बनवू शकतो. यासाठी आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम असणे गरजेचे आहे. 

 

आर्थिक हव्यासात जखडलेली आरोग्य यंत्रणा मुक्त करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी ती खुली करणे, हे स्वराज्यचे ध्येय आहे. गरजवंतांना आरोग्य बाबतीतले लाभ सहज मिळावेत, यासाठी स्वराज्य संघटना सर्व स्तरांवर कार्य करेल.